"२६/११ कसाब आणि मी" - BOOK REVIEW



   





      26/11 .... मुंबईकरांसाठी काळा दिवस... या आठवणी मनाच्या कोपऱ्यात डोकवल्या तरी डोक्यात मुंग्या आल्याशिवाय राहत नाही. डोक्याच्या शिरा आपोआप ताणल्या जातात. शरीराचा एकूण एक अवयव पेटून उठतो. नुसता राग राग आणि राग येतो. पोटात गोळा येतो. मन अजूनही कुठेतरी घाबरतं. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. सूडाची भावना जागी होते. मग मनात सुरू होतो प्रतिशोध.....हो ना ??? पण शांत व्हा. आपण २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत अतिरेकी कसाबला फासावर चढवण्यात आपलं पोलीस दल यशस्वी झालं आहे.

  या दहशतवादी हल्ल्याचा तपासाचा अनुभव लेखक रमेश महाले यांनी "२६/११ कसाब आणि मी" या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने या घटनेतील अनेक बारकावे समोर येतात.

   ही घटना घडत असताना सामान्य माणसापासून ते रेल्वे कर्मचारी, रहिवासी, पोलीस अधिकारी, शिपाई, हवालदार या सगळ्यांनी आपल्या देशाप्रती कर्तव्य चोखपणे पार पाडलं. जीवावर उदार होऊन अनेकांनी नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. आणि स्वत:चे प्राण दिले ही.

  काही घटना कदाचित वृत्तपत्र, वाहिन्यापर्यंत पोहचल्या नसतील. पण लेखक या गुन्ह्यातील तपास अधिकारी आणि साक्षीदार असल्याने त्यांनी अनेक घटना आपल्या डोळ्यांसमोर घडताना पाहिल्या आहेत. अनुभवल्या आहेत. बारकाईने या पूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला आहे. पुस्तक वाचताना आपल्याही ते लक्षात येईलच.

   ही घटना घडल्यानंतर राजकीय नेते तर एकमेकांवर आरोप करत पेटून उठले होते. काही वाहिन्या, वृत्तपत्र तर प्रसिद्धीसाठी वाटेल ते बोलत होते. यात आपण सामान्य नागरिकही कुठे कमी नव्हतो बरं का.

अरे, त्या  कसाबवर का एवढा देशाचा पैसा खर्च करायचा?’
फासावर लटकवा त्याला; ‘पाकिस्तानचा बदला घ्यायला हवाच
पोलीस दल काय झोपले होते का?
  अशा बिनबुडाच्या टीका त्यावेळी करण्यात आल्या. ही झाली आपली बाजू. पण देशाची, पोलिसांची बाजूही ऐकून घ्यायला हवी. एखाद्या घटनेचा वा विषयाचा सखोल अभ्यास करायचा असेल तर दोन्ही बाजू समजून घ्यायलाच हव्या. नाण्याची दुसरी बाजू लेखकाने अनेक बारकावे, उदाहरणं देऊन वाचकांपर्यंत पोहचववण्याचा करण्याचा विनम्र प्रयत्न केला आहे.

   पाकिस्तानात कासाबसारख्या अशिक्षित, आर्थिक परिस्थितीत अडकलेल्या तरुणांना भारताविरुद्ध भडकवले जाते. अनेक चुकीच्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलपर्यंत बिंबवल्या जातात. AK-47 चालवण्यापासून ते Grenades फेकण्यापर्यंत शिक्षण दिलं जातं. अत्यंत खुबीनं आणि कौशल्यानं अतिरेकी AK-47, RDX सारख्या गोष्टी सहजपणे हाताळत होते. अतिरेक्यांना बम्बई भाषाही शिकवण्यात आली होती. आपाला कोणी पाठलाग करत असेल तर ते कसं ओळखावं? पाठलाग करणाऱ्याला चकवा कसा द्यावा? अशा अनेक छोट्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टीचं प्रशिक्षण त्यांना दिलं गेलं होतं.

 पुस्तक वाचताना देविड हँडले, अबू जिंदाल अशा अनेक अतिरेक्यांची पार्श्वभूमी सुरुवातीला वाचताना त्यांचा या प्रकरणाशी असलेला संबंध पटकन समजत नाही. पण पुस्तक पुढे वाचत जातो तसं या अतिरेक्यांचा असलेला संबंध ऐकामागून एक उलगडत जातो. त्यामुळे या पुस्तकाच्या निमित्ताने खात्रीलायक असलेली अतिरेक्यांचा इतिहास आपल्याला समजायला मदत होते.

     पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मुंबई पोलिसांबद्दल अभिमान वाढतो आणि मान गर्वानं ताठ होते. त्यामुळे एकदा तरी "२६/११ कसाब आणि मी" हे पुस्तक वाचायला काही हरकत नाही असं मला वाटतं.

(book review कसा वाटला नक्की कळवा. आणि हो पुस्तक कुणाकडे available  नसेल तर story tell app वर तुम्ही audio book ऐकू शकता. )

                                                                                                                      -Pradnya K. Agale.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग... पहिली स्टोरी...

ट्यूज डे विथ मॉरी (Tuesday With Morrie) BOOK REVIEW

... पण 'तु हवा आहेस'